नवी दिल्ली । कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. मात्र या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात 500 ते 600 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला आहे.
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.तर दुसरीकडे केंद्रानं निर्यातबंदी उठवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले होते. मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय़ घेतल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने कांदा कोंडी निर्माण झाली आहे. कांद्याचे भाव २६०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. तर मुंबई बंदरातून निर्यातीसाठी निघालेला ४०० कंटेनर कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे.
देशभरात आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात दररोज वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. नाशिकमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर वाढलेला दिसून येत आहे. वाढते दर रोखण्यासाठी केंद्रसरकारकडून ही निर्यात बंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कांदा पुन्हा रडवणार अशी स्थिती दिसून येत आहे.